मधुमेह्याची साखर !

मधुमेह म्हणजे रक्तात वाढलेली साखर हे एव्हाना आपल्याला चांगले माहिती झाले असेल.

ही रक्तातली साखर वाढते कशी याची जरा अधिक सुस्पष्ट कल्पना यावी म्हणुन एक आलेख आपल्या समोर मांडत आहे.

मधुमेह नसलेल्या व्यक्तींची रक्त शर्करा सामान्यत: ७० ते ९ या पातळीवर राखलेली असते ही एक आदर्श स्थिती आहे.

आपण जेव्हा काही खातो , मग तो नाष्टा असो की जेवण , त्या अन्नावर पोटात प्रक्रिया होते आणि त्याची साखर बनते , ही नव्याने तयार झालेली साखर मग रक्तात दाखल होते , त्यामुळे रक्तातल्या साखरेच्या पातळीत वाढ होते पण त्याच वेळी आपल्या शरीरातील ‘पॅन्क्रियाज’ नामक ग्रंथीतून ‘इन्शुलिन ‘ नामक संप्रेरकाची निर्मिती पण होते आणि हे ‘इन्शुलीन’ पण रक्तात मिसळले जाते , या ‘इन्शुलीन’ चा वापर करुन आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना साखर पुरवली जाते आणि हळू हळू रक्तात वाढलेल्या ह्या जादाच्या साखरेच पूर्ण निचरा होऊन रक्तातली साखर पुर्ववत आपल्या ७० ते ९० या स्थिर पातळी वर येते.

 


 


निळ्या रंगातला आलेख मधुमेह नसलेल्या व्यक्तीचा तर लाल रंगातला आलेख मधुमेही व्यक्तीचा आहे


सोबतच्या आलेखात पाहीले तर दिसेल की:

.

मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या रक्तातली साखर सुरवातीला ८० ते ९० च्या दरम्यान होती, खाणे झाल्या नंतर ही साखर वाढायला सुरवात झाली, साधारण एका तासात ही साखर तिच्या सर्वोच्च पातळी वर म्हणजे १४० च्या आसपास पोहोचली आणि एव्हाना पेशींनी ‘इन्शुलीन’ च्या मदतीने साखर खेचायला सुरवात केलेली असल्याने ही साखर लगेच कमी पण व्हायला सुरवात झाली. साधारण पणे खाल्ल्यानंतर दोन तासांनी ती जवळपास पूर्ववत म्हणजे ८० ते ९० आली सुद्धा, मामला खतम !

मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत रक्तातली साखर सुरवातीलाच १२० ते १४० अशी वाढलेल्या स्थितीत होती ! मधुमेह्याने खाणे झाल्या नंतर ही साखर वाढायला सुरवात झाली, साधारण एका तासात ही साखर तिच्या सर्वोच्च पातळी वर म्हणजे २२५ च्या आसपास पोहोचली . ही कमालीची धोकादायक स्थिती आहे, साखर इतकी वाढणे चांगले नाही ! खाल्या नंतर मधुमेह्याची ही वाढलेली साखर पण कमी व्हायला सुरवात होते जरूर पण मुळात मधुमेह्यामध्ये एकतर पुरेसे ‘इन्शुलीन’ नसते किंवा इन्शुलीन अवरोध’ निर्माण झाल्याने पेशींना ‘इन्शुलीन’ वापरता न आल्याने (काही वेळा ही दोन्ही कारणें एकत्र पण असतात) , साखर कमी होण्याचा वेग कमालीचा मंद असतो! साधारण पणे खाल्ल्यानंतर दोन तासांनी ती जवळपास १८० च्या आसपास घुटमळत राहीली, ही देखील एक धोकादायक स्थितीच आहे! मधुमेह नसलेल्या व्यक्तीत साधारण दोन तासात सारे सामसुम होते , पुर्ववत होते पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला , रक्तशर्करा खाण्याच्या आधी होती त्या पातळी वर यायला, चक्क ६ ते ८ तास लागले !

आणि इथे मग होते काय , मधुमेह्याच्या रक्तातली वाढलेली साखर जी साधारण सहा – आठ तासात पूर्ववत होते तशी व्हायच्या आतच मधुमेही पुन्हा काहीबाही खातो, रक्तातली साखर अजून १६० च्या आसपास असताना पुन्हा त्यात नव्या साखरेची भर पडते आणि कमी होऊ पाहणारी रक्तातली साखर पुन्हा एकदा उसळी मारून , एक नवे शिखर गाठते , १६० वर असलेली साखर आता २५० चा टप्पा ओलांडते , काही वेळा तर ही चक्क ३०० ला गवसणी घालते! साखर कमी / पूर्ववत व्हायच्या आतच खाणे घेत राहील्याने एक दुष्टचक्र निर्माण होते !

कोणा एका सेलेब्रिटी आहारतज्ञ बाईंचे ऐकून, एखाद्या मधुमेह्याने दिवसातून (थोडे-थोडे? ) पाच – सहा वेळा खायचे ठरवले तर नेमके काय होऊ शकते याची आपल्याला आता कल्पना आली असेल!

‘दिवसातून फक्त दोन वेळाच खा आणि दोन खाण्यात पाच – सहा तासांचे अंतर ठेवा ‘ हा डॉ.दिक्षीतांचा सल्ला किती योग्य आणि बहुमोल आहे नै का?

शुभं भवतु 

Similar Posts

4 Comments

Leave a Reply to Prashant Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *